पृष्ठे

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

गांधीजी ...एक अद्भुत व्यक्तिमत्व !!

 "येणाऱ्या भावी पिढ्या कदाचित यावर विश्वास ठेवणार नाहीत कि एकजण असाही होता जो या मांस अन रक्ताच्या वातावरणात अहिंसेच्या मार्गावर  चालत होता."

अल्बर्ट आईन्स्टाईन



होय हे खुद्द आईन्स्टाईन ने आपल्या महात्म्याबद्दल लिहिलंय. आणि आज हे असे अचानक गांधींजींबद्दल डोक्यात यायला दोन गोष्टी आहेत. एकत्र आज गांधीजींची जयंती आहे अन अन योगायोगाने काल मी सेवाग्राम ला जाऊन आलोय.
या माणसाचे मला भयानक नवल वाटते कि एव्हढी किरकोळ शरीरयष्टी पण हट्टी पण अन स्वाभीमान  कुटून कुटून भरलेला. जॉर्ज पंचम समोरही पंचाअन धोतरावर जाऊन उभा राहिला ...चर्चिल म्हटला  सुद्धा ह्या अर्ध्या  नंग्या  फकिराला राजाने का भेटावे ? पण कीर्तीच अशी दरवळली होती कि राजाला पण ह्या माणसाला भेटावेसे वाटले. राजशिष्टाचार पहिल्यांदा तोडला गेला असेल ज्या  साम्राज्याचा सूर्य कधीही अस्त ना पावणाऱ्या त्या दरबारात . बाहेर पत्रकाराने कमी कपडे घालण्याबद्दल विचारले तर मिस्कील उत्तर आले कि राजाने आमच्या दोघांचेही कपडे घातलेलेच होते कि.
सेवाग्राम ला गेल्यावर पहिल्यांदा डोळ्यात भरतो तो तिथला साधेपणा . म्हणजे इतका साधेपणा कि चक्रावून जायला होत. आश्रमाने जशी गांधींजींच्या काळात स्थिती होती अक्षरशः तशीच राखून ठेवलीय त्या वास्तूंची.वर्धा आश्रम पूर्वी कसे असेल हा प्रश्न मला पडला कारण आजही ते शहर त्याचा साधेपणा राखून आहे. त्यावेळी तर ते अत्यंत दुर्गम असावे किंवा असेलच. अन या महात्म्याच्या पदस्पर्शाने ते पावन झालंय. अश्या या वर्ध्यात स्वतः गांधीजींचे वास्तव्य असल्याने खुद्द व्हॉइसरॉयला तिथे टेलिफोन ची सुविधा करायला लागली . त्यावेळी मी तर म्हणेन  नागपुरात कुठेतरी मोजके टेलिफोन असतील .आजही बऱ्याच ब्रिटिश इमारती वर्ध्यात दिसतात ही सगळे गांधीजींची किमया .एव्हढा हिमालयाएवढा उत्तुंग माणूस तिथे राहतो म्हटल्यावर गोऱ्यांना तिथे राहणे भाग पडले . गांधीजींना तिथे आणण्यात जमनालाल बजाज यांचाही सिंहाचा वाटा होता किंबहुना तेच यासाठी कारणीभूत होते. परंतु या गोष्टीने  वर्धा जगाच्या नकाशावर प्रसिद्ध मात्र झाले. आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व थोर व्यक्तींचे सान्निध्य वर्ध्याला लाभले.
बऱ्याचदा मोठ्या व्यक्तीची उपदेश करणे हि एक अंगभूत सवय असते मात्र  स्वतः त्याचे पालन न करणे हेही एक सहसा आढळते .पण महात्माजी स्वतः आधी करीत अन तोच त्यांचा उपदेश असे. बघा सेवाग्राम ला गांधीजींचे  १९३६ ते १९४८ एव्हढा मोठा काळ वास्तव्य होते. अन त्यांच्या वस्तू , वास्तू अन तेथले वातावरण पाहतांना निश्चितच जाणवते कि निखळ साधेपणा तिथे असणार. पण हा साधेपणा मला हादरवून टाकतो जेव्हा कळते ह्या शेणाने सारवलेल्या ठिकाणी इंग्लंडचे भारताचे व्हॉईसरॉय लॉर्ड लिनीथागो बसून गांधीजींशी संवाद करीत बसले होते. सर स्ट्राफोर्ड क्रिप्स ने तिथेच बसून क्रिप्स कमिशन बद्दल गांधीजींशी चर्चा केली होती . आणिहि कितीकजण.. आकडा मोठा आहे . काय होत या माणसात ? लॉर्ड हॅलिफाक्स ( ब्रिटिश परराष्ट्र सचिव जो कि पूर्वी भारताचा व्हॉईसरॉय राहिला होता ) जेव्हा हिटलरला गांधीजींविषयी बोलला तर हिटलर म्हणतो गोळ्या घाला कि त्या मनुष्याला , अन डझनभर कोणी मध्ये येत असतील तर त्यांनाही गोळ्या घाला अन हे चालू ठेवा ...हसला असेल मनात  हॅलिफाक्स ...बिचार्या हिटलर काय माहिती कि मध्ये पडणारे काही डझनभर लोक नाहीत पूर्ण देशच आहे . गांधीजींनी हा विविधता असलेल्या देशाला एकजीव बनवले होते.हे सोपे नाही .
आईन्स्टाईन येणाऱ्या भावी पिढीबद्दल सांगतोय अन मला तर आताच वाटते कि हि दंतकथा आहे. काय काय प्रयोग नाही केले त्यांनी आयुष्यात. खाण्याबद्दल , आचरणाबद्दल , वनस्पती आणि औषधी आणि हो सत्याबद्दलचेही .मी तर म्हणतो एव्हढे सत्य स्वतः धर्मराजही बोलला नसेल किंवा वागला नसेल.या कलियुगात अशी व्यक्ती म्हणजे आश्चर्यच..एव्हढी स्वयंशिस्त ,अन एव्हढे मनावर अन शरीरावर करडे नियंत्रण हे सगळेच चकित करणारे.
आतापर्यंत ऐकीव असल्याने त्याच एव्हढा परिणाम झालेला नव्हता परंतु जेव्हा सेवाग्राम ला गेलो त्यावेळी मात्र गांधी नावाच्या माणसाने गारुड केले. अजून जास्त काही वाचलेले नाही पण परततांना मनाशी ठाम खूणगाठ बांधली कि जास्तीत जास्त गांधींजींविषयी  वाचन करायचे . अगदी सखोल . त्यासाठी आता लुई फिशर ने लिहिलेले त्यांचे चरित्र वाचायला घेतले आहे.
गांधीजींबद्दल एक सांगायचं मोह टाळता येत नाही कि गांधी म्हटल्यावर गुजरात आठवत नाही कारण ते पूर्ण देशाचे होते .ही माझ्या मते खूप महत्वाचे आहे.
लेख बहुदा बालिश वाटू शकेल पण उबळच  एव्हढी होती  कि तोकडे ज्ञान असतांना या माणसाविषयी  काहीतरी लिहायची उर्मी दाटून आली.
आजच्या भंपक अन उत्सवप्रिय राजकारण्यांना पाहिल्यावर तर हा माणूस अधिकच उठून दिसतो. दिल्लीत १५ ऑगस्ट १९४७ ला  स्वातंत्र्य उत्सव चालू असतांना तिथे न रमता हा माणूस नोआखली मध्ये जाऊन तिथे दंगल नियंत्रण करीत होता.आजचे राजकारणी देश जळत असला तरी तिथे स्वातंत्र्यता उत्सव साजरा करीत बसली असती अन त्याचे श्रेय लाटत बसली असती. खरे तर या अर्धवट खुज्या राजकारण्यांना या महात्म्याची कवडीची सर नाही पण यांचे थिल्लर चाळे बघितल्यावर पूर्वीचे लोक किती उत्तुंग  उंचीचे होते ही लक्षात येते अन ती खदखद कागदावर उतरवण्याचा मोह टाळता येत नाही. अन आजच्या पिढीला तर गांधीजी कळणे हि काळाची गरज आहे.गांधी हा एक विचार आहे  अन तो अमर आहे.अनेकजण होऊन गेले ,कारकीर्दही भली राहून गेली त्यांची पण जसा काळ जातो आहे त्या व्यक्ती धूसर होताहेत , कालांतराने विस्मरणातही जातील परंतु गांधीजी नाही ...असा लोकोत्तर पुरुष पुन्हा होणे नाही.
गांधींजींवर सखोल वाचन करून मी माझे विचार लवकरच मांडेन पण तूर्तास एव्हढे सांभाळून घ्या.
आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त या माहात्म्यास त्रिवार वंदन......

विवेक पगारे
नागपूर..

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

हृदयाची गोष्ट...

 अगदी खरे सांगतोय ..अस्वस्थ ..भयंकर अस्वस्थ होतो मी आणि आहे सुद्धा .पण तरीही तुम्ही मला वेडा का म्हणाल ? त्या नैराश्याने माझ्या संवेदना अजूनच तीक्ष्ण केल्या आहेत. म्हणजे नष्ट तर नाहीच पण बोथट हि नाहीच नाही.अन वरकडी म्हणजे माझी श्रवण क्षमता तर भलतीच तीव्र झालीये म्हणजे मी पृथ्वीवरचे तर सोडा अन स्वर्गातलेही सोडा ..आपण एकदम नरकातल्या सुद्धा गोष्टी ऐकू शकतो. आता मला सांगा कि मी वेडा कसा ? आता मी जी काही सगळी हकीकत तुम्हाला शांतपणे अन अगदी तपशिलाने सांगणार आहे ती जरा ऐका.

आता ती कल्पना माझ्या या डोक्यात कशी जन्मली ते सांगणे अगदी अशक्य आहे. पण जशी ती कल्पना सुचली तशी दिवस रात्र तिने मला अगदी अक्षरशः झपाटून टाकले . म्हणजे असं आहे बघा, तसे काही विशिष्ठ कारणही नव्हते ना त्याच्याशी काही भावना गुंतलेल्या होत्या. उलटपक्षी मी त्या म्हाताऱ्याला जीवच लावायचो.बिचार्याने कधी माझा दुस्वास केला नाही कि माझा अपमानहि केला नाही. त्याच्या संपत्ती बद्दल मला कवडीचेही आकर्षण नव्हते. मला वाटते त्याचा तो डोळा...हो हो डोळाच. त्याचा तो गिधाडा च्या डोळ्याप्रमाणे दिसणारा तो एक घाणेरडा डोळा .. लपलपता पापुद्रा असलेला तोच डोळा ..निळा अन निस्तेज. जेव्हा कधी त्या डोळ्याची दृष्टी माझ्यावर पडे मी एकदम जागच्या जागी थिजून जाई. अक्षरशः मला किळस येत असे . असेच एकदा मग ठरवले कि या म्हाताऱ्याची वासलात लावायची जेणेकरून मला त्या घाणेरड्या डोळ्यापासून कायमची मुक्ती मिळेल.
आता कुठं सगळं कसं स्वच्छ झालं बघा. तुम्ही मला वेड्यात काढाल पण वेड्यांना कुठशी काही माहित असते ? कश्या हुशारीने अन काळजीपूर्वक अन विशेष म्हणजे अगदी निर्विकार पणे मी जे काही केलं ते तुम्ही बघायलाच हवं. मी नित्यनियमाने कामावर जात होतो. अन खरेच सांगतो या आठवड्यात मी त्या म्हाताऱ्यावर जे अलोट प्रेम केलं ते मी यापूर्वी म्हणजे त्याला ठार मारण्यापूर्वी कधीही केले नव्हतं. नित्यनियमाने प्रत्येक रात्री...म्हणजे मध्यरात्रीच मी हलकेच त्याच्या बेडरूमच्या दाराची कडी उघडून , माझे डोके आत जाईल इतका तो उघडायचो. अगदीच हळुवारपणे..मग हातातला पूर्ण काळा कंदील आत सरकवायचो ..अगदीच काळा . म्हणजे प्रकाशाची एकही रेघ बाहेर येता कामा नये. मग मागून मी झर्रकन आत घुसत असे. तुम्ही असता ना हसलाच असता माझी लबाडी पाहून ...मग अगदी म्हणजे अगदी हळू हळू मी हालचाल करीत , जेणेकरून म्हाताऱ्याची झोपमोड होऊ नये , असा एका ठिकाणी जेथून म्हाताऱ्याची हालचाल मला स्पष्ट दिसेल , उभा राहत असे. हे सर्व करायला माझा तासभर तरी जाई . एखादा बावळट अशी हुशारी दाखवू शकेल ? मग एकदा का मी त्या जागी तयार झालो की , लगेच कंदिलाची वात अगदी काळजीपूर्वक ..हो हो अगदी काळजीपूर्वक कमी करीत असे , इतकी कि फक्त प्रकाशाचा एक किरण त्या म्हाताऱ्याच्या त्या गचाळ डोळ्याचा वेध घेईल. असे माझे आठवडाभर म्हणजे बघा सलग सात रात्री चालू होते .मध्यरात्री यायचे म्हणजे अगदी हळुवार, कंदिलाच्या फिरकीचीही करकर होऊ नये याची काळजी घेत मी तासभर त्या म्हतार्याच्या खोलीत घालवायचो. पण दुर्दैवाने मला तो हिडीस डोळा कायम बंद दिसायचा त्यामुळे माझा हेतू साध्य होत नव्हता. म्हाताऱ्याने नाही तर त्याच्या त्या सैतानी डोळ्याने मला बेजार केलं होत. जसा दिवस उजाडे, मग मी साळसूद होऊन त्या म्हाताऱ्याची प्रेमाने चौकशी करीत असे. रात्री झोप वगैरे व्यवस्थित झाली कि नाही याची अत्यंत मित्रत्वाने विचारणा करीत असे.बिचार्याला झोपेतही वाटलं नसेल कि मी रोज रात्री ..मध्यरात्री त्याच्यावर पाळत ठेऊन आहे.
आठव्या रात्री नेहेमीपेक्षा अधिक सावधगिरीने , म्हणजे बघा एकवेळ घड्याळाचा मिनिट काटा जॊरात चालेल ,त्यापेक्षा हळुवार पणे मी दरवाजा उघडत होतो.ह्या रात्री ,कुणास ठाऊक मी एवढा रोमांचित कधीही झालेला नव्हतो बहुदा मला माझ्या सुप्त शक्तीचा साक्षात्कार झाला असावा त्यामुळे स्वतःला मी काबूत ठेवायचा अथक प्रयत्न करीत होतो.हळू हळू दार लोटत असतांना , माझ्याबद्दल अन माझ्या त्याच्याबद्दल असलेल्या विचारांची त्या बिचार्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल ,या विचाराने मला थोडे हसू आले. बापरे...त्याचवेळी कूस बदलतांना म्हातारा अचानक थोडा बिचकल्याचा भास
झाला.आता तुम्ही विचार कराल कि मागे फिरलो असेल .नाही ...मुळीच नाही . त्याची ती भयाण अंधारी अन गडद काळी खोली अन त्यात चोर चिलटांच्या भयाने ते अत्यंत काळजीपूर्वक बंद केलेले दरवाजे ,त्यामुळे त्याला जराही शंका आलेली नसणार. त्यामुळे मी अत्यंत काळजीपूर्वक दार लोटत होतो.
मी डोके आत घेतले अन कंदिलाची फिरकी फिरवतांना थोडीशी गफलत झाली ...माझ्या हाताचा अंगठा फिरकीवरून जरासा घसरला ,,,म्हातारा दचकून उठला अन किंचाळला ..."कोण आहे ?"
मी स्तब्ध उभा ...काहीही न बोलता ..पूर्ण तासभर तरी मी उभा न हालचाल करता ...एकदम पुतळ्यागत .पण मला म्हातारा परत झोपल्याचे जाणवले नाही..तोही बहुदा तसाच टक्क जागाच अन अनुभवतोय अगदी अगदी माझ्यासारखाच ,अनेक रात्रींपासून...भयाण मृत्यू ची चाहूल ...!!
त्याचवेळी मला एक हलकासा विव्हळण्याचा आवाज आला ,नक्कीच मरणाची चाहूल लागल्यावर जी भीती वाटते ,तिचाच होता. तो वेदना किंवा दुःख यापैकी नव्हताच , मरण भयाने आत्म्याच्या विलाप तो...
हा आवाज मी ओळखतो.चांगलाच ओळखतो ..सगळं जग झोपलेले असतांना कित्येक रात्री ...मध्यरात्री माझ्या स्वतःच्या छातीतून खोलवरून आलेला एक प्रबळ ,भयंकर ...जो नेहेमीच मला हादरवून सोडी . मी म्हटले ना मी ओळखतो त्याला..नक्कीच ओळखतो. मला कळते आहे म्हाताऱ्याला आता काय वाटते आहे , मला किंवा येतेय त्याची ,तरीसुद्धा मला किंचितसे हसूही येतेय..मला माहितेय कि तो जेव्हा पहिल्यांदा कुशीवर वळला अन त्याने आवाज ऐकला तेव्हापासून तो जागा आहे ...भीतीने त्यावर गरुड केलंय. तो स्वतःचीच समजूत घालीत असेल कि बहुदा वाऱ्याचा हा आवाज किंवा एखादा उंदीर नाहीतर किरकिरणारा रातकिडा असू शकेल.पण त्याला कळून चुकलंय...सगळं व्यर्थ आहे ...व्यर्थच..कारण मृत्यू घटिका समीप आलीये हे कळलं आहे त्याला..भले दिसून नका देऊ पण अस्तित्व जाणवते ..नक्कीच जाणवते..मृत्यूची काळी गडद सावलीने सावजावर निष्ठुर पणे आपले जाळे टाकायला चालू केलेय...माझ्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच त्याला झालीये जरी मी दिसलो नसलो तरी.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मी कंदिलाची एक छोटीशी अगदी छोटीशी फट खोलली , जरी मला माहितीये कि म्हातारा पुन्हा झोपलेला नाहीये ..तुम्ही कल्पना करू शकत नाही कि मी अत्यंत लपून अन धैर्याने हे काम करतोय...
अन जशी ती फट उघडली ..एक हलकिशी कोळ्याच्या धाग्यासारखी एक फिकट प्रकाशाची रेघ नेमकी त्या किळसवाण्या डोळ्यावरचा पडली...
शीट...तो उघडा होता ...हो तो हिडीस डोळा त्यावेळी चांगलाच सताड उघडा होता...माझ्या मस्तकात संतापाची तिडीक उठली..तोच तोच सर्वांपेक्षा वेगळा असा...निळे बुब्बुळ अन वर तेलकट पापुद्रा असलेला घाणेरडा डोळा...माझ्या शरीरात भीतीची थंडगार लहर पसरली. एव्हढे होऊन सुद्धा मी कंदिलाचा प्रकाश त्याच्या डोळ्यावरचा रोखून धरलेला होता, त्याक्षणी मला त्याचा चेहरा किंवा तो स्वतः ..कुणीही दिसत नव्हते.
तुम्हाला मी आधीच बोललो नव्हतो का कि तुम्ही नेहेमीच वेडेपणा आणि संवेदनांची तीव्रता समजण्यात चूक करतात ..कशी ते आता सांगतो.माझ्या कानात एक आवाज ऐकू येतोय ...जरासा क्षीण ..दबका परंतु जलद असा ...जसे एखादे घड्याळ कपड्यात गुंडाळून ठेवले तर जसा आवाज येईल तसा...मी ओळखलाय हा आवाज..त्या म्हाताऱ्याच्या हृदयाची धडधड हि ...पण त्यामुळे माझ्या रागाचा पारा आणखीनच वाढतोय...ज्याप्रमाणे रणवाद्यांचा दणदणाटाने एखाद्या शूर सैनिकाचा युद्धज्वर वाढतो...
तरीही मी एकदम निश्चित अन शांत आहे.माझ्याही छातीचा भात आता वेगाने खालीवर होतो आहे..तरीही मी प्रकाश त्या डोळ्यावर स्थिर ठेवलेला आहे.. माझ्याहि हृदयात भयंकर धडधड वाढलीये..अन ती क्षणोक्षणी अविरत वाढतेच आहे अन तिचा आवाजही प्रचंड वाढला आहे...म्हाताऱ्याचीही भीती आता बहुदा अत्युच्च पदावर पोहोचलीये..कारण पदोपदी ती वाढतेये..तुमच्या निदर्शनात एक गोष्ट आली का ? मी तुम्हाला आधी सांगितलेले कि मी अत्यंत अस्वस्थ आहे , तर मी आहेच .. या वेळेस, रात्रीच्या भीषण शांततेत त्या जुनाट घरात त्या गोंगाटाने मी भयग्रस्त झालोय..काही वेळ मी शांत उभा राहायचा प्रयत्न केला परंतु त्या मोठमोठ्याने धडधडणाऱ्या ठोक्यांनी मला वाटते कि हृदय आता फुटेल..आता नवीनच भीती मला भेडसावायला लागलीये कि हा आवाज शेजाऱ्यांनि ऐकला तर...? म्हाताऱ्याची वेळ आता आली ,मोठ्याने किंचाळत मी प्रथम तो कंदील वाढवला अन म्हाताऱ्याच्या दिशेने झेप घेतली. म्हाताऱ्याने भीतीने एक किंकाळी फोडली ....फक्त एकच..क्षणार्धात त्याला मी फरशीवर ओढले आणि ती अत्यंत जडशीळ गादी त्याच्यावर टाकली. आतापर्यंतच्या माझ्या कृतीने मी चांगलाच उत्साही होतो. म्हाताऱ्याच्या हृदयाची धडधडही आता क्षीण झाली होती म्हणजे जवळपास थांबलीच होती. मी निश्चिंत होतो कि हा आवाज आता काही बाहेर जाणे शक्य नाही. थोड्या वेळात म्हातारा हि मेला. मी गादी बाजूला केली , त्याच्या शरीराचे निरीक्षण केले.हो तो अगदी दगड झालेला होता अगदी थंडगार दगड..मी मग बराच वेळ त्याच्या निश्चल छातीवर हात ठेवून अंदाज घेतला ,धडधड पूर्णपणे थांबलेली होती. म्हातारा मेला होता , आता त्याचा तो घाणेरडा डोळा मला कधीही त्रास देणार नव्हता.
जर अजूनही तुम्ही मला बावळट समजत असाल तर ज्या पद्धतीने अन ज्या कुशलतेने मी त्याच्या शरीराची विल्हेवाट लावली ते तर तुम्हाला सांगितलेच पाहिजे..रात्र भरभर संपत चालली होती त्यामुळे मीही माझी कामे पटपट उरकायला लागलो, पण एकदम शांततेत..सर्वप्रथम मी धडाचे सगळे अवयव वेगळे केले..म्हणजे हात,डोके अन पाय व्यवस्थित कापले.
मग त्या खोलीतल्या फरशीच्या ३ फळ्या काढल्या आणि हे सर्व अवयव धडासहित मी व्यवस्थित दोन तुळ्यांमध्ये ठेवले. त्यानंतर ज्या हुशारीने अन समंजसपणे मी सगळी आवराआवर केली अन सर्व गोष्टी जश्या अन तश्या लावून ठेवल्या कि कोणालाही तसूभरही संशय न यावा...अगदी म्हाताऱ्याला सुद्धा ..ना कसलीही खूण ना रक्ताचे डाग ..कसलाही मागमूस मी मागे ठेवला नाही अगदी कसलाही...याची सर्व जबाबदारी एका टब ने घेतली...हा हा हा
हि सर्व मेहनत घेत असतांना ४ वाजले. तरी अजूनही चांगलाच अंधार होता.जसे घड्याळाचे ठोके पडले नेमके त्याच वेळी कोणीतरी बाहेरचा दरवाजा ठोठावला. मी खाली गेलो , दार उघडले अन स्मित हास्याने आलेल्या तिघांचे स्वागत केले ..मला कसली भीती ? आपण पोलीस अधिकारी असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले..रात्रीच्या वेळेस शेजारी कोणीतरी एक भीषण किंकाळी ऐकल्याने पोलिसात तक्रार केली होती अन त्याच संदर्भात हि मंडळी आलेली होती.
मी स्मित हास्य केले ..मी कशाला घाबरू ? मी त्या पोलिसांचे स्वागत केले अन त्यांना सांगितले कि ती किंकाळी माझीच होती...रात्री मी स्वप्नात घाबरून मारली होती. अन म्हातारा ही बाहेर देशी गेलेला होता. त्यानंतर मी त्या सर्वांना पूर्ण घरात फिरवले..त्या खोलीतही नेले.म्हाताऱ्याची संपत्ती दाखवली जी बिलकुल सुरक्षित होती. त्यांना अजून काही शोधायचे असेल तर मी मदत करतो असे सांगितले. तेव्हा मी आत्मविश्वासाने एवढा भरलेली होतो कि मी त्याच खोलीत खुर्च्या टाकून त्यांना जरा आराम करण्यासाठी बसवले अन खुद्द एका खुर्चीत जिच्या नेमक्या खाली मी म्हाताऱ्याला गाडले होते ,तिच्यात बसलो.
अधिकारी समाधानी दिसत होते.मी अत्यंत प्रभावी पद्धतीने त्यांचे मन जिंकले होते. अत्यंत दिलखूलास पणे अन आनंदाने मी त्यांना उत्तरे देत होतो. त्यांनी मग ढोबळ गप्पा चालू केल्या. पण थोड्याच वेळात मला त्यांनी आता इथून निघून जावे वाटू लागले ,मी स्वतःला अगदी दुबळा वाटू लागलो.माझे डोके आता दुखायला चालू झाले अन कानातही विचित्र आवाज यायला सुरु झाले. पण तरीही ती मंडळी मात्र निवांत गप्पा मारतच होती अन निघायचे नावसुद्धा काढीना. आता कानातले आवाज किंवा कंपन्न म्हणा हवे तर अजूनच वाढायला लागले. हळूहळू हा आवाज इतका वाढला कि यातून सुटका व्हाव्ही म्हणून मी मोठ्याने बोलायला लागलो..पण बापरे आवाज आता टिपेला पोहोचला होता. पण नंतर माझ्या लक्षात आले कि हा आवाज माझ्या कानातला नव्हता...
निःसंशय मी आता पार थकलो होतो.पण माझे बोलणे मात्र एकदम जलद चालले होते परंतु एकदम उच्चरवात..आवाज वाढतोच आहे...आता मी तरी काय करणार? बारीकसा ,थोडा क्षीण परंतु जलद असा आवाज....नेमका तोच कापडात गुंडाळलेल्या घड्याळाच्या टिकटिक चा ..मी श्वास घ्यायला आ वासला., पण अधिकाऱ्यांनी मात्र ऐकले नाही. मी आता अत्यंत मोठ्याने अन अगतिकतेने बोलत होतो पण गोंगाट आता हळूहळू वाढतच चालला होता. मी आता उगीचच क्षुल्लक गोष्टींसाठी मोठ्या आवाजात अन मोठमोठ्याने हातवारे करीत भांडत होतो. आवाज वाढतच चालला होता. हि लोक का जात नाहीये...? मी आता त्यांना संशय येऊ नये म्हणून जोरजोरात ढांगा टाकीत खोलीतच येरझाऱ्या मारायला सुरुवात केली. दाणदाण पाय आपटायला सुरुवात केली .आवाज वाढतच चालला होता. अरे परमेश्वरा...आता मी काय करू? माझ्या तोंडाला फेस यायला लागला, मी उगीचच शिव्या हासडायला लागलो ..तोंड फाटेपर्यंत मी मोठ्याने ओरडायला लागलो.अन बसलेल्या खुर्चीला मोठमोठ्याने मागेपुढे करायला लागलो.त्यामुळे अक्षरशः खालच्या फर्शीला चरे पडायला लागले.आता आजूबाजूचा गोंधळ अधिकच तीव्र व्हायला लागला , अगदी तीव्र ..तरीही हि मूर्ख माणसे निवांतपणे गप्पा मारतायत...अन वरून खिदळतायेत...त्यांना काहीही ऐकू येत नाहीये का ? सर्वशक्तिमान परमेश्वरा ....नाही नाही ते ऐकताहेत ..त्यांना संशय आलेला आहे ..त्यांना सर्व माहिती आहे. माझ्या वाटणाऱ्या भीतीची ते खिल्ली उडवताहेत..जेव्हा हे मी बघितलं ,मी विचार केला कि या यातनांपेक्षा काहीतरी नक्कीच चांगले असणार. या अपमानापेक्षा ,या उपहासापेक्षा नक्कीच काहीतरी सहनीय असणार ..आता मी ते छद्मी हसू नाही सहन करू शकत..मला मी नक्कीच जिवाच्या आकांताने किंचाळणार किंवा मरणार असे वाटू लागले..आणि आता ...पुन्हा ...लक्षपूर्वक ऐका ....अजून मोठा...मोठा ...खूप मोठा ....मोठा ....मोठा ....
"नतद्रष्टांनो" .. मी किंचाळलो ..." आता माझ्याच्याने हे गुपित लपवणे निव्वळ अशक्य आहे ...मी माझ्या केलेल्या कृतीची कबुली देत आहे..त्या फळ्या काढा इथं ..इथंच त्याचे ते धडधडणारे घाणेरडे हृदय आहे....!!!"

" The Tell - Tale Heart " या एडगर अॅलन पो च्या लघु कथेचा स्वैर अनुवाद......

सोमवार, १८ मार्च, २०२४

आमची संगीत यात्रा..

काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो. 

त्यावेळी मात्र मला माझ्या म्युझिक सिस्टीम ची आठवण झाली. माझ्या लहानपणी आमच्याकडे नॅशनल चा आडवा (पॅनासॉनिक) टेप रेकॉर्डर होता. माझे वडील त्याला एक स्पीकर एक्सटेंशन लावून त्यावर गाणी ऐकत. तो पायोनिर कंपनीचा होता हे अजूनही मला आठवते. वडील त्याला करणा म्हणायचे. त्यावर आम्ही प्रल्हाद शिंदे ,भीमसेन जोशी यांची भक्तिगीते ऐकत असू. वडील राष्ट्र सेवा दलात असल्याने राष्ट्र सेवादलाचीच गाणी सदोदित वाजत असत. त्या टेप अन त्या करण्यामुळे मला संगीताची प्रचंड आवड निर्माण झाली. तो टेप माझा  माझ्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षांपर्यंत सोबती होता. त्याच्या सदाबहार आठवणींचा एक कप्पा अजूनही माझ्या मनात आहे. असा हा टेप माझ्या स्वतःच्या ताब्यात मी कोपरगावला शिकायला आल्यावर आला.तोपर्यंत त्याची एकदमच अवस्था झालेली होती. पण बिचारा संगीत मात्र ऐकवत होता. पूर्वी तो तारुण्यात असतांना त्याचा  पूर्ण घरभर संचार असायचा मात्र सध्या तो जर्जर झाल्याने एका लाकडी कपाटात विसावला होता.
त्याचे पुढचे कव्हर गायब झालेले होते ,त्यामुळे झाले काय कि कॅसेट जशी संपत असे ,हा तुसडा टेप तिला बाहेर फेकून देत असे.माझे मित्र या गोष्टीला खूप हसायचे. त्यामुळे मला कॅसेट संपायची वेळ जशी जवळ येत असे,तसे  मी आगाऊ उठून त्याला  बंद करीत असे .त्यामुळे बऱ्याचदा माझी इज्जत वाचे  परंतु थोडी जरी गफलत झाली तर हा खडूस टेप त्याचा डाव साधायचाच. माझी मित्रमंडळी तुलनेने माझ्यापेक्षा बरीच सधन,त्यांच्याकडे चांगल्या वस्तू होत्या परंतु आमच्या घरातील स्वातंत्र्य ,तसेच माझी अभ्यासाची वेगळी खोली त्यामुळे सगळी माझ्याकडे जमत असत अन पर्यायाने माझ्या अश्या भयंकर गोष्टी त्यांना सहन कराव्या लागत ....बिचारे..
आता तो पूर्वीचा वडिलांचा करणा नव्हता .माझ्या मामाने दिलेला एक स्पीकर होता जो स्टिरिओ ला असायचा. पण हा स्पीकर म्हणजे एक ध्यान च होते.पण मी त्याला व्यवस्थित वापरत होतो अन तोही बिनतक्रार माझी सेवा  करीत होता. तसे त्याला मी एक चांगले आसन दिलेले म्हणजे एका मोठ्या माठावर मी त्याला स्थानापन्न केलेले होते. त्यामुळे आनंदून तो सुरात गात असे. हा माठ मी त्या कपाटावरच ठेवला होता. कोणीतरी मठात अर्धे पाणी भरल्यास अजून चांगला आवाज येतो असे सांगून माझी फिरकी घेतलेली पण मी सश्रद्ध असल्याने तोही प्रकार करून पहिला होता.पण आवाज अजूनच खराब झाला ,त्यामुळे पुर्वव्रत च ती व्यवस्था ठेवली गेली.
कधी कधी आवाजात खर खर चर चर असा आवाजही सामील होत असे.त्यावर अर्थिंग नसल्याने असे होत आहे म्हणून कोणीतरी सांगितले.मग बऱ्याच तज्ज्ञांना त्यावर उपाय विचारल्यावर एक तार स्पिकरला  बांधून तिचे दुसरे टोक भिंतीत  खिळा ठोकून त्यास बांधावे जेणेकरून स्पिकरला  ला अर्थिंग मिळेल. आणि काय आश्चर्य ,हा उपाय भलताच परिणामकारक ठरला. फक्त अधून मधून त्या खिळ्यावर पाणी मारावे लागत असे जेणेकरून आवाज पुन्हा व्यवस्थित होत असे. त्यामुळे आम्ही जेव्हा संगीत ऐकत असू अन अचानक  खर खर चर चर आवाज यायला लागल्यास आमच्यात असलेला कोणीही उठून काहीही न बोलता त्या खिळ्यावर पाणी मारीत असे अन आवाज पुन्हा व्यवस्थित होत असे. त्यासाठी मी सलून मध्ये जसे फवारा असतो तो मी मिळवलेला होता,अन त्यामुळे हे पाणी मारण्याचे काम सोपे होत असे. याला एक प्रकारचे तेव्हाचे नॉइज कॅन्सलेशन असावे.
आणि हो टेप ला एक घाणेरडी सवय होती ,मधूनच  तो बंडाचे निशाण उभारी अन बंद पडत असे.बहुदा मला लहानपणापासून त्याने बघितलेले असल्याने हा अर्धवट काय मला आज्ञा देतो म्हणूनच जाणून बुजून त्याचे वरिष्ठपण दाखवीत असावा.पण मी त्याच्या वरिष्ठ पणाची कवडीचीही तमा न बाळगता त्याला मागून एक हलकासा  फटका मारीत असे , मात्र या अपमानानंतर तो मात्र सुरळीत चालू होत असे. असे आमचे अनेक मतभेद होते मात्र दरवेळी माझा विजय होत असे. फक्त मित्र मंडळी जमल्यास तो कॅसेट फेकून तो त्याचा बदला घेत असे. फिदी फिदी हसणाऱ्या माझ्या मित्रांसमोर माझा झालेला अपमान त्याला बहुदा सुखावत असावा .
या टेप सारखीच माझी माझ्या कॅसेट्च्या संग्रहाबद्दल आहे. त्यावेळी बाहेरच्या दुकानात आपली आवडती गाणी कागदावर त्याच्या फिल्म्स सहित लिहून द्यावी लागत ,त्या बरहुकूम तो दुकानदार ती कॅसेट गाण्यांनी भरून देत असे.त्यावेळी या कॅसेट मध्ये गाणी भरून देणाऱ्यांचा वेगळाच तोरा असे. अत्यंत तुसडेपणाने हि मंडळी वागत.जणू पुढच्यावर ते एक उपकारच करीत असत.वेळेत कॅसेट न देणे ,थोडी जागा उरली असल्यास भलतेच गाणे मध्ये घुसडणे  अश्या बऱ्याच उचापती हि मंडळी करीत. मी पूर्वी T - सिरीज ची कॅसेट वापरीत असे ,परंतु माझ्या मित्राकडे मी पहिल्यांदा सोनी च्या कॅसेट्स पहिल्या अन त्यांच्या प्रेमात पडलो.६० मनात अन ९० मिनिटांच्या त्या कॅसेट्स.अत्यंत सुमधुर आवाज अन त्यांचा टिकाऊपणा ,त्यामुळे माझ्या कपाटात नंतर मात्र त्याच कॅसेट्स दिसू लागल्या. अन मी अत्यंत कल्पक पणे अन एकाच मूड ची गाणी  भरीत असल्याने माझ्या मित्रांमध्ये या कॅसेटची प्रचंड मागणी होती. त्यानांही आवडत असे. मला हि सवय माझ्या मित्राच्या घरी असलेल्या कॅसेट मधील गाण्यांमुळे लागली.त्याने त्यात फक्त चांद शब्द असलेलीच गाणी भरलेली होती. मला हा प्रकार खूप  आवडला. अन त्याप्रमाणे मीही तशीच गाणी भरू लागलो. त्यावेळी मी मुकेशच्या गाण्यांचा चाहता होतो. त्याची खूप म्हणजे सर्वच गाणी वारंवार ऐकायचो. त्यामुळे मी मित्रांना म्हणायचो कि मुकेशने नुसती गाण्याच्या सुरुवातीची तान जरी घेतली तरी मी ते गाणे ओळखू शकतो.
त्यावेळी शाहरुख अन काजोलचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट आलेला होता.त्यातले "तुझे देखा तो ये " हे गाणे माझे प्रचंड आवडते .त्यामुळे मी एका कॅसेटमध्ये सलग तेच भरले. (जेव्हा दुकानदाराला ते सांगत असतांना तो माझ्या कडे विचित्र पणे पहात असल्याचे मला अजूनही आठवते.) या कॅसेटची एक आठवण आहे. मी कॉलेजला गेलेलो असतांना माझा मित्र विलास ( याने शाळा १० वि नंतर सोडून दिलेली अन अशीच किराणा दुकानात काम करायचा अन माझा लहानपणापासूनच खास मित्र ,याला माझ्या रुम मध्ये कधीही  आडकाठी नव्हती ) रूमवर आला. मस्त टेप लावून पलंगावर पसरला.अन नेमकी हीच एका गाण्याची कॅसेट टेपमध्ये होती.विलास माझ्यापेक्षा मोठा पण भयंकर भित्रा. गाणे ऐकतांना बहुदा त्याला झोप लागली असावी. थोड्यावेळाने त्याला जाग आली तेव्हा झोपेच्या आधी जे गाणे चालू होते तेच गाणे आताही वाजत होते. त्याला शंका आली. त्याने थोडे फॉरवर्ड केले तेच गाणे ,मग त्याने कॅसेट उलटी केली तेच गाणे , इकडूनही पुढे मागे घेतली असता तेच गाणे ....बापरे त्याला ती भुताटकी वाटली अन त्याने किंचाळून धूम ठोकली.बरेच दिवस तो इकडे फिरकला नाही ,एकदा भेटल्यावर त्याला विचारले तेव्हा त्याने हे सांगितले तेव्हा माझी हसून हसून पुरेवाट झाली. पण जेव्हा कारण कळले तेव्हा मला त्याचे दोन धपाटे खावे लागले.  
बऱ्याचदा हा अवखळ टेप कॅसेट्च्या रिबिनला अडकवीत असे अन बंद पडे,त्यावेळी त्याची मर्जी सांभाळून अत्यंत अलगद ती रिबीन बाहेर काढावी लागत असे. अनेकदा ती तुटे ,परंतु या गीष्टीवर माझे प्रभुत्व होते.एखाद्या शल्यविशारदाप्रमाणे माझी अवजारे बाहेर निघत. पेन्सिल,ब्लेड ,टिस्को टेप. टिस्को टेप व्यवस्थित फितीच्या रुंदीप्रमाणे कापणे अन व्यवस्थित दोन टोकांना चिटकविणे. हे वेळखाऊ तसेच धैर्याचे काम होते. जर फीत जिथे तुटली तिथेच चिटकवली तर गाणे वाजताना थोडासाच फरक जाणवे परंतु जर फीत तुटून चुरगळली गेल्यास कापावी लागे,अन चिटकवावी लागे. त्यामुळे एक गाणे चालू असतांनाच दुसरे गाणे उपटसुम्भासारखे मधेच चालू होई तेही मध्येच कुठूनतरी.पण गाणे ऐकतांना कोणीही याचे आश्चर्य किंवा विचित्र वाटून घेत नसे उलट माझे मित्र अश्यावेळी माझ्याकडे कौतुकाने बघत कि याने हि तुटलेली कॅसेट व्यवस्थित केली. मला अश्यावेळी स्वर्ग दोन बोटे राहत असे. या कौशल्यामुळे माझे मित्र बऱ्याचदा मला त्यांच्या तुटलेल्या कॅसेट ठीक करण्यासाठी आणून देत ,ही मात्र वैतागाची गोष्ट होती.
त्यावेळी कोपरगावात बरीच टेप ची दुकाने होती.विशेष म्हणजे कोपरगाव सर्किट म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.या सर्किट वर ,ज्याने हे बनवले त्याने एक मोठ्ठा बंगला बांधला होता.आम्हाला त्या गोष्टीचा खूप अभिमान होता. मला हा टेप घ्यायची खूप इच्छा होती पण ते कधीच  जमले नाही.
काळाच्या ओघात हा टेप कुठे नाहीसा झाला ते कळले हि नाही.सर्व कॅसेट्स सुद्धा कुठे गेल्या हेही लक्षात नाही.परंतु टेपच्या त्यावेळच्या तारुण्यातल्या आठवणी अजूनही मनात गर्दी करतात.आजकालच्या मुलांना खरेही वाटणार नाही अश्या या गोष्टी. आपण यासर्वांचे साक्षीदार असल्याने काळानुसार सगळे कसे बदलले हे पाहून भयचकित होतो.पण त्यावेळी दुनिया हि खरी होती जरी त्यावेळच्या गोष्टी अत्यंत प्राथमिक स्वरूपातल्या असल्या तरी.आताच्या भ्रामक दुनियेत ते एक सुवर्णपान होते. आताच्या गोष्टींना दोष देत नाही परंतु त्यावेळचा जिव्हाळा अन एकत्र बसून संगीत ऐकणे हि गोष्टही आजच्या पिढीला काल्पनिक वाटेल.
असो कालाय तस्मे नमः ,दुसरे काय.....

विवेक पगारे 
नवी दिल्ली 

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

तो राजहंस एक .....

​कालचा भारत पाकिस्तान ची T  20 चा सामना ज्याने बघितला नसेल तो कमनशीबीच समजेल मी .कालच्या सामन्यासाठी सगळी बिरुदे अपुरी थिटी ठरतील असा ha सामना. 

विराटची खेळी पाहतांना का त्याला सर्व स्रेष्ठ समजावे हे कळले .कमालीचा आत्मविश्वास ,एक प्रकारचा जिद्दी आत्मविश्वास .मी हे करू शकेल असे नव्हे तर मी हे करणारच अन हेच माझे काम आहे. बापरे ....त्याच्या प्रत्येक कृतीतून हे ठळक पणे व्यक्त होत होतं .

आमच्या पिढीने तेंडुलकरला पाहिलेला ,त्याची खेळी अशीच पण मला एक सूक्ष्म फरक नमूद करावासा वाटतो.तेंडुलकर असाच सर्वोत्तम सार्वकालीन ,प्रचंड अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणारा .मी तर म्हणेन असे ओझं व्हायची कोणाची कुवत नाही अन असे अपेक्षांचं अक्षरशः संपूर्ण भारतीयांचं अपेक्षांचं ओझं tyane वाहिलंय .म्हणजे सगळी टीम जरी परतली अन तेंडल्या असेल तर प्रत्येक भारतीय निश्चिन्त असायचा कि सचिन आहे ना .पण आज मला जरा वेगळं सांगायचं आहे .

सचिन जरी अश्या परिस्थितीत कूल असायचा ,tyachya खेळी त सच्चाई असायची ,जिंकून देऊ अशी त्याची तळमळ असायची परंतु त्याच्या कडून अशी खेळी कधीतरीच भेटली बघायला .आता विराटला घेऊ ,सचिनचे जे काही गुण  मी सांगितले ashya परिस्थितले ,सगळे सेम परंतु या पुढे विराट चालू होतो .विराटकडे भयंकर जिद्द आहे अन हट्टीपणाही कि मी हा सामना जिंकणार ....किंबहुना हे माझे कर्तव्य आहे .अन अश्या प्रतिकूल परिस्थितीत त्याची खेळी अधिकच बहरते .

सचिनचा मी निस्सीम चाहता आहे परंतु विराट एका पावलाने त्याच्यापेक्षा सरस आहे हे मी मानतो .

असो

कालच्या सामन्याने बऱ्याच गोष्टी साध्य केल्यात.ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य माणूस महागाईने पिचलेला होता ,हंगर  इंडेक्स मध्ये भारताची पीछेहाट ,डॉलर च्या तुलनेत खोल गर्तेत गेलेला रुपया असे अनेक नैराश्य पसरवणाऱ्या वातावरणात विराटची हि खेळी एक आश्वासक फुंकर आहे ,एक दुर्दम्य विश्वास आहे कि जाईल हि पण वाईट परिस्थिती सरेल . अन प्रत्येक भारतीयाला ha संदेश आहे कि स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवा ,कितीही प्रतिकूल वातावरण असू दे ,स्वतःवर विश्वास अन ताबा असेल तर सहज ह्या परिस्थिती वर आपण विजय संपादन करू.

या दशकातील या खेळीला सर्व स्रेष्ठ  मानतो मी.त्यात तिला भारत पाकिस्तान हा विशेष कंगोरा आहे.

शेवटी जाता जाता विराटच्या खेळी बद्दल एकच म्हणता येईल ...शानदार ....जबरदस्त .....झिंदाबाद ....

दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....


विवेक पगारे 

पुणे -21


रविवार, १९ जून, २०२२

फादर्स डे.....

फादर्स डे......
मला हे पाश्चात्यांचं खूप आवडतं की कुणाबद्दलही कृतदनत्यां व्यक्त करायला ते उगीच कंजूष पणा करीत नाहीत....ज्याने त्याने आपल्यावर उपकार केले आहेत किंवा आपले जीवन ज्या मुळे सुकर झाले आहेत त्याबद्दल ते खुल्या मनाने अभिप्राय देतात. फादर्स डे त्यापैकीच एक.
म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत आपणही आभार किंवा कृतज्ञाता व्यक्त करतो पण ती अंग चोरून किंवा लपून छपून... पाश्चात्य संस्कृतीत असे नाही,जेही कराल ते दिल खोलके... हेच मला भावतं... नाहीतर तुमच्या मनात खूप आहे पण तुम्ही बोलत नाही मग ते काय उपयोगाचं?असो..
आपण आता आजच्या फादर्स डे बद्दल बोलू..बऱ्याच जणांना आपल्या वडिलांबद्दल आदर असतो पण ते शब्दात वगक्त करीत नाहीत...अहो आजचा जमाना सगळं संगण्याबद्दल आहे ,नाही की लपवण्याबद्दल...खरे तर जुना जमानाही असाच होता पण तो या आनंदाला वंचित राहिला.पण आज तसे नाही,बऱ्याच गोष्टी आहेत आजकाल..तुम्ही व्यक्त होऊ शकतात कुठेही अन कसेही...अन गरज आहे याची.
आजकाल जीवन बिनभरवश्याचे झालेले आहे कधीही काही होऊ शकते...त्यामुळे मनी आलेले विचार लगेच सांगितले पाहिजेत किंवा हे जे त्यासाठी दिन झालेले आहेत त्या दिवशी तरी किमान सांगितले पाहिजे नाहीतर नन्तर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.
मी तर म्हणेन ,जर तुम्हाला एखाद्याबद्दल कृतदनात्या व्यक्त करायची असेल तर तुम्ही उशीर करू नका...सांगा लगेच नाहीतर उशीर होईल.
असो...आजच्या फादर्स डे बद्दल..माझे खरे स्फूर्तिस्थान माझे वडीलच..त्यामुळेच मी घडलो... आज ते हयात नाहीत परंतु त्यांची कायम स्मृती स्मरणात राहील....

सोमवार, २ मे, २०२२

ती...स्वमग्न...

ती होतीच तशी...
म्हणजे तशी नव्हे...
आता तुम्ही विचाराल की काय बोलतोय कळते का...?
अरे हो जरा दमाने घ्या..
मला म्हणायचंय की ती तशी खूप खट्याळ,बोलकी अन स्वप्न वेडी...
पण झालं असच काहीतरी
तर ही झाली एकदम गंभीर अन अबोल
खरं तर ती गंभीर नाही कधीही
पण परिस्थितीने अन तीच्या व्यक्तिमत्वाने तिला अबोल केलंय..
म्हणजे बघा, ती पूर्वी गुंतलेली कामात अन त्यामुळे ती व्यस्त तसेच आत्मनिर्भर...
परंतु येन केन कारणाने तिचे काम गेले, अन तिला सगळेच सुनेसुने वाटू लागले
सवय तिची स्वावलंबी
त्यामुळे तिला रिकामे कसेसेच वाटायचे
अन या सगळ्याचा परिपाक तिच्या बदलण्यात झाला
अन विशेष म्हणजे ह्या एवढ्या बदलाची कुणीही दखल घेतली नाहीं तो एक वेगळाच मनस्ताप...
हळूहळू स्वभाव अबोल अन गंभीर झाला
खुलायची बरका ती तशी वातावरण खेळकर असतांना
परत काही आठवल्यावर बावरायची अन पुन्हा जायची स्वमग्नतेत.....
स्वाभिमानी असल्याने तिला माहिती की तिला जमणार नाही इतरांसारखे काहीही घर बसल्या उट पटांग कामे करायला..
त्यामुळे कोमेजूनच गेली ती....
ठीक आहे,पण नको करू एवढा मनस्ताप
मला खूप वाटते तिच्याबद्दल,पण हा समाज...
असू द्या,या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तर हक्काने वरेल तिला ....