काल मुलाला घेऊन शाळेत गेलो होतो. आज सुट्टी होती परंतु त्याची शाळेत समूहगीताची स्पर्धा होती . त्यांच्या शाळेची 10-12 मुले आलेली होती. अन स्पर्धा रामकृष्ण मठात होती. त्यांचा सर्वांचा व्यवस्थित गणवेश पाहून आणि तयारी पाहून मला माझ्या समूहगीताच्या स्पर्धेची आठवण आली.
1985-86 सालची गोष्ट असेल. त्यावेळी मी बहुधा 6 वीत होतो. आणि सांस्कृतिक स्पर्धेत तेव्हा मी नेहमी भाग घेत असे. कोणताही कार्यक्रम असो माझे गाणे अथवा भाषण ठरलेले असायचे. अश्याच एका तालुका लेव्हल स्पर्धेसाठी आमचा एक गट बनवला होता. माझ्यासारखेच वयक्तिक गाणी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरांनी गट बनविला होता. जोर्वेकर सर होते . नेहेमीच गाणी म्हणणारी पोर म्हणून आमचा सराव घ्यायची त्यांनी काही तसदी घेतली नाही. पहिल्या दिवशी तेव्हढे गाऊन घेतले. बरीच सुधारणा आवश्यक होती परंतु सरांनी एव्हढे काही मनावर घेतले नाही. स्पर्धेला बहुधा 15-20 दिवसांचा अवकाश होता.
एव्हढ्या दिवसात आम्ही आमची काहीतरी स्पर्धा आहे विसरूनच गेलो होतो. आणि बहुतेक सरही विसरले असणार. कारण त्यांनीही काही स्पर्धेविषयी ब्र काढला नव्हता.
आणि अचानक सायकलवर गावात उंडारतांना माझा शाळेतला मित्र ( हाही त्या गटात होता , अन माझ्यापुढे 2 वर्षे असेल ) भेटला. त्याने स्पर्धेविषयी सांगितले , उद्या स्पर्धा आहे , लक्षात आहे ना ? अरे बापरे , मी तर विसरलोच होतो. बरोबर उद्या तो रविवार होता . त्याला वेळ विचारून मी तडक घरी पळालो.
आता स्पर्धेचे ठिकाण माहित होते , गावात कन्या शाळेत स्पर्धा होती , 11 वाजता. सकाळी आवरून सायकलवर टांग मारली. शाळेत पोहोचलो. अजून आमचे सहकारी आलेले नव्हते. हळूहळू एकेक जण विविध अवतारात यायला लागला.मी तर गणवेशात नव्हतोच , परंतु तिघे चौघेही गणवेशात नव्हते. 3 जण गणवेशात होते. आमच्या पैकी दोन जण बिना चपलांचेच आले होते . मी स्लीपर वर होतो , बिचारे गणवेश वाले मस्त बूट , मोजे घालून एकदम टापटीप आलेले होते. आम्ही सरावाच्या वेळी 12 जण होतो आणि आता तर 8 जणच आलेले होते. सरांचाही पत्ता नव्हता. आणि विशेष म्हणजे आम्ही हि स्पर्धा जेवढी गांभीर्याने घेतलेली नव्हती ( हे आमच्या अवतारावरून दिसत होते.) तेव्हढी मात्र बाकीच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी पुरेपूर घेतलेली होती. सगळे एकदम चकाचक गणवेशात आणि बूट मोज्यात आलेले होते. आता तालुका लेव्हल म्हणजे बऱ्याच शाळांचे विद्यार्थी होते. त्यात आम्ही म्हणजे अगदीच गबाळ छाप होतो.
स्पर्धा चालू झाली. अन आम्ही मात्र भेदर्लो. कारण सगळ्यांची तयारी एकदम जोरात आणि समूहगीतेही अगदी जोशात अन तालात म्हणत होती. जसजसा आमचा नंबर जवळ यायला लागला , आम्हाला घाम फुटायला लागला.
तेवढ्यात आमचे जमदग्नी हि अवतरले. (सर). त्यांनी जेव्हा आमचा अवतार पहिला, त्यांना आता हि धरणी दुभंगवी आणि आपण लुप्त व्हावे असेच वाटले असावे कारण त्यांच्या डोळ्यात अंगार फुललेला आमच्यासाठी आम्ही पहिला अन त्याच वेळी चेहऱ्यावर भयानक शरमेची भावनाही पहिली.
जेव्हा आमचा नंबर पुकारला गेला आणि आम्ही स्टेज कडे निघालो , तेव्हा मात्र मला आमचे सर हळूहळू दरवाज्याकडे सरकतांना दिसले. आम्ही स्टेज वर चढलो , कोणी कसे उभे राहावे ,हेही आम्हाला माहित नव्हते. बरं, 3 जण वरिष्ठ विद्यार्थी होते (हेच गणवेशात होते) , त्यांनी कसेबसे आम्हाला उभे केले. आता गाण्याची वेळ होती.
आणि तो विनोदी प्रसंग चालू झाला , त्याचवेळी आमचे सर बाहेर घाईघाईने पडतांना दिसले. मी सर्वात लहान असल्याने पुढेच उभा होतो त्यामुळे पुढचे स्पष्ट दिसत होते.
समूहगीताचे काय वर्णन करावे ? कोण काय गात होते , कोणालाच कळत नव्हते. बहुतेक सर्वजण सवयीप्रमाणे वयक्तिक गात होते. रेकल्यागत कोणीही कुठेही सूर लावत होते .कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. बहुधा समोरच्या प्रेक्षकांना ( सगळ्या शाळांमधील स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक विद्यार्थीच प्रेक्षक होते .), हा मधला ब्रेक असावा असे वाटले अन सगळे लघुशंका किंवा पाणी प्यायला निघाले. त्यामुळे आमची शोभा मर्यादित राहिली. आणि विशेष म्हणजे जी पोर आलेली होती ती नेमकी वरच्या पट्टीत गाणारी होती आणि त्यांना सांभाळून घेणारी नेमकी आलेली नव्हती त्यामुळे झाले काय आमचे गाणे अखंड वरच्या पट्टीतच चालले. मी पुढे असल्याने बऱ्याच जणांनी आपले हात कानावर ठेवल्याचे मला पुसटसे आठवते.
गाणे संपल्यावरही एकजण त्याच्या धुंदीत होता , बहुतेक त्याची समाधी लागली असावी कारण तो अजूनही रेकत होता. आमच्या वरिष्ठांनी त्याला ओढल्याचेही मला आठवते. परंतु मी पुढे असल्याने हे मला दिसले नाही , माझ्या एका सहकार्याने मला पायऱ्या उतरतांना सांगितले. आता आम्ही लहान असल्याने मला एवढे काही वाटत नव्हते परंतु आमच्या वरिष्ठांनी आम्हाला ज्या पद्धतीने तिथून हाकलून दिले त्यावरून काहीतरी खरोखरीच भयंकर घडले आहे असे वाटले, कारण आम्हाला तिथे बसून पुढचा कार्यक्रम बघायचा होता.
मी सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो. त्यावेळी बरेच स्पर्धक आमच्याकडे बघून हसत असल्याचेही मला अंधुकसे स्मरते.
दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही काय घाण केली हे आम्हाला प्रार्थनेच्या वेळी समजले. जोर्वेकर सर फारच संतापलेले दिसत होते. अक्षरशः माईक मधून अंगारे फेकत होते. सगळ्या शाळेची मान आम्ही खाली घातली म्हणून ओरडत होते. आम्ही मात्र निवांत होतो.
रविवार, ६ डिसेंबर, २०२०
माईलस्टोन....
खरं तर दहावीलाच लक्षात आलेलं त्याच्या.परंतु कोणावरही उगीच दडपण आणून काही करायला लावणे हे त्याला पटण्यासारखे नव्हते.म्हणजे स्वतःच्या मुलाबाबत सुद्धा.तरी त्याचे जवळचे मित्र सांगायचे बरका त्याला की पोरांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नाही चालत.अधून मधून टोकलं पाहिजे,रिव्ह्यू घेतला पाहिजे.तोही ठरवायचा पण पुन्हा तेच.होतंच नसे त्याच्याकडून.त्याला त्यावेळी त्याचा काळ आठवायचा की दादांनी कधीही त्याला टोकलं नाही की विचारले नाही.उलट त्याच्या कोणत्याही निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले असायचे.अन त्यांचा विश्वास ही होता त्याच्यावर.तो सेम थिअरी लावीत होता स्वतःच्या पोराला.खरं तर त्याचं पोरगही खूप सिंसिअर. त्याला त्याच्यात तो दिसायचा.कारण त्याच्याच आवडी पोरात उतरलेल्या.चित्रं काढणं,कथा कविता करणं इ इ.या गोष्टीमुळे त्याने त्याला विचारणेच सोडून दिले,म्हणजे हा आपल्याप्रमाणेच असेल असे.तसे ते पोर पण होतं हुषार. पण जसा हा कामानिमित्त दुसऱ्या गावी गेला अन पोरगं दहावीत गेलेलं.तसा हा निर्धास्त होता कारण त्याची थिअरी.पण दहावीच्या परीक्षेच्या आधीच्या परीक्षांचे निकाल त्याला कोड्यात टाकणारे होते.अन त्यामुळे तो थोडासा भेदरला होता.
गणित त्याचा आवडीचा विषय. दहावीला त्याला पैकीच्या पैकी गुण मिळालेले.त्यामुळे पोराच्या गणिताच्या पेपरच्या आधी सुटी टाकून तो घरी आला अन उजळणी करून घेतली.निकाल लागला तेव्हा पोराने इतर विषयात बरे गुण मिळवले परंतु गणितात 92 मिळवले.हा तेवढ्याच गोष्टीने खुश.पण काय कुणास ठाऊक मनात शंकेची पाल चुकचुकली.
त्याच्या ज्या मित्रांची मुलं दहावीत होती त्यांनी दहावीनंतर पोरांना डिप्लोमा ला टाकले.पण हा त्याच्या भयंकर विरोधात होता.भले तुम्ही नंतर दहावीनंतर चा कोर्स करा परंतु मुलांना 11वी अन बारावी चे कॉलेज दिवस अनुभवू द्यायचे हे त्याचे मत होते.कारण कॉलेजची ही दोन वर्षे म्हणजे मुलांच्या तारुण्याच्या सुरुवातीची एक हळुवार पहाट आहे असे वाटायचे त्याला.कारण दहावीपर्यंत मुलं शाळेच्या शिस्तीत अन लगेच त्यांना डिप्लोमा वगैरे प्रोफेशनल शिक्षणाला टाकून त्यांच्यातली तारुण्याची कळी खुलण्याआधीच त्यांना करियर वगैरेची चिंता लावून देणे म्हणजे अमानवी वाटायचे त्याला.तडक प्रोफेशनल शिक्षणाला प्रवेश घेण्याआधी मुलांनी थोडे कॉलेज लाईफ अनुभवले पाहिजे.थोडी मजा घेतली पाहिजे.तणाव विरहित थोडे हुंदडले पाहिजे असे त्याचे स्पष्ट मत.त्यामुळे त्याने पोराला कॉलेजला टाकले,शास्त्र शाखेत.अन ते साहजिक होतं. परंतु पोराने हद्द केली,अकरावीत अक्षरशः काठावर पास झालं. हा प्रचंड विचलित झाला.पालक होणे ही काय चीझ आहे त्याला चांगलीच कळली.कधी नव्हे ते पहिल्यांदा तो पोराच्या काळजीने हादरला.आतापर्यंत तो जे वागला,जे विचार केले त्यालाच पोराने छेद दिला होता.आपण जे वागलो ते चुकीचे होते या विचारानेच तो पार कोलमडून गेला.सुरुवातीपासून मित्रांच्या सांगण्याप्रमाणे वागायला हवं होतं असं वाटू लागलं.पण एक मन मानत नव्हतं,पोरगं थोडं भरकटल असेल,झाला असेल निष्काळजी पणा.परंतु बारावीतही तेच.नापास होता होता पोरगं वाचलं.असेही नाही की त्याला क्लासेस लावले नव्हते.असं का होतंय त्याला काही समजेना.अन पोराने बॉम्ब टाकला की त्याला आर्टस् करायचे.बापरे!आता हे काय नवीन ? तसे आर्टस् बद्दल त्याचे वाईट मत आजिबात नव्हते.परंतु आर्टस् च्या मुलांची परिस्थिती तो पहात होता.पण तरीही त्याने पोराचे आर्टस् चे ऍडमिशन केले.अगदी शेवटच्या क्षणाला.पण एक मन खट्टू होतं.
पोराचं चाललं की त्याला आर्टस् मूळ भरपूर वेळ मिळेल अन त्याला स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देता येईल.तसे हा युक्तिवाद रास्त होता.परंतु स्पर्धा परीक्षा आजकाल कुठं नियमित होतायत.त्यात वेळ गेला अन समजा काही झाले नाही तर पुढे काय? आर्टस् ने असे काय होणार ? त्याच्यातला बाप आणि सद्य परिस्थितीची जाण असलेला लॉजिकल माणूस यात भयंकर द्वंद्व चालू झालं. अन पोरगं सिंसिअर असलं तरी त्याच्या निर्णयावर ठाम होतं. आता ही गाठ कशी सोडवायची?त्यासाठी त्याने त्याच्या शहरातल्या एका नामांकित संस्थेत पोराची ऍपटीट्युड टेस्ट घेतली.तिचा निकाल येणं बाकी होतं. अन त्याचा आज नेमका शेवटचा दिवस,उद्या कामावर परतायचं होत.ही कोंडी त्याच्या मित्राच्या फोनने अचानक फोडली.हा जेव्हा बाहेरून घरी गेला त्यावेळी पोरगं चिडलेलं होतं, कारण मित्राने चांगलाच क्लास घेतला होता त्याचा.आता याने स्वतःकडे सगळी सूत्रं घेतली.पोराला हळुवार समजावून सांगितलं.तसे याचे समजावणे खूप परिणाम कारक. त्याच्या बोलण्याने पोरगं एकदम उर्जित झालं.अन त्यात विशेष त्या ऍपटीट्युड टेस्ट चा निकाल आला,त्यात त्याला चांगले गुण मिळाले.अन त्या मॅडम नेही पोराला झापलं की एवढे पोटेनशियल असतांना त्याने फक्त आळस केलेला होता.आळसानेच त्याचा घात केलेला होता.पोराच्या डोळ्यात त्यामुळे चांगले अंजन गेले.
अन विशेष म्हणजे हा सर्वात समाधानी होता कारण त्याच्यातली अपराधी पणाची जाणीव आपोआप गळून पडली होती.नवीन आशा पल्लवित झाल्या होत्या.एक बिनकामाच्या कुशंकेचे जे मळभ त्याच्या मनात दाटले होते ते विरून गेले होते.अन विशेष म्हणजे पोरगं ही जे मरगळ लेलं होत त्यालाही उभारी आलेली होती.त्याच्या आईने स्वतःहून फोन करून सांगितलं कि आजकाल त्याच्या वागण्या बोलण्यात खूप सकारात्मक बदल झालेला होता.त्यामुळे हा सुखावला होता.पोरानं स्वतःहून जाऊन आर्टस् चे ऍडमिशन रद्द करून इंजिनियरिंग ला ऍडमिशन घेतले होते.अन फोन करून सांगितलं की आता चिंता करू नका,मी करीन.
जरी भविष्यात काय होणार माहीत नाही तरी तो या स्टेज च्या आशादायी माईलस्टोन ने खूप खुश होता.
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
थंडी पडायला चालू झालीय.वातावरणातला गारवा दिवाळी जवळ आल्याची आठवण करून देतोय.दरवर्षी ही थंडी दिवाळीची चाहूल घेउन येते.त्यात खंड नाही.अन दरवर्षी हे सर्रास बोललं जाणारं वाक्य की यावेळी मागच्या पेक्षा जास्त थंडी आहे.असं असतं तर एव्हाना शितयुग सुरू झालं असतं.विनोद बाजूला ठेऊयात,का मनुष्य मागच्या ,भूतकाळातल्या गोष्टींपेक्षा वर्तमानाला जास्त
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
सद्यस्थिती....
सध्याची भारतातली ,महाराष्ट्रातली राजकारण,सामाजिक परिस्थिती पाहता कोण्याही विचारी माणसाला नैराश्य यावे अशीच आहे.कारण चालू काय आहे अन करतो काय आहोत हा प्रश्न सध्या पडतो आहे.म्हणजे ही वरची मंडळी नेमके अशी कशी वागू शकते हे विचार करण्याच्या पलीकडे गेलेलं दिसतंय.
सुशांत,रिया प्रकरण-
सगळ्या भारतासमोरच्या सध्याच्या समस्या ह्या गौण आहेत अन फक्त सुशांत ची आत्महत्या अन रिया चे संबंध ही सध्याची सर्वात मोठी बातमी मीडिया ने लावून धरली आहे. म्हणजे अक्षरशः कहर मांडला आहे. केंद्राने हस्तक्षेप करून विनाकारण CBI ला आत आणले,डोंगर पोखरून उंदीर ही निघाला नाही तर हसे होऊ नये म्हणून त्या रिया ला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे.माझा काही रिया ला पाठिंबा नाही परंतु मीडिया ने उगीचच प्रकरण इतके तापवले की रिया एक खूप मोठी खलनायिका ठरवली गेलीय.असतील चुका परंतु ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले जात आहे ते पाहून रिया बद्दल सहानुभूती वाटते.जिवंतपणी सुशांतला एवढी सहानुभूती आणि प्रसिद्धी मिळाली असती तर तो अमली पदार्थांकडे चुकूनही गेला नसता की त्याने आत्महत्या ही केली नसती!
कंगना अन राऊत वाद-
खरे तर हा वाद च नाही पण उत्तरेकडील मंडळींनी उगीचच ताणून धरलेले प्रकरण आहे.उत्तरेकडे महाराष्ट्राबद्दल एक सूक्ष्म असूया आहे. इथला इतिहास,मुंबई,बॉलिवूड ई ई. त्यामुळे इथं थोडं काही झालं की त्याचे पडसाद तिकडे दुपटीने उमटतात.त्यामुळे सगळ्यांच्या नजरा इकडे लागतात अन त्यात जर अमराठी -मराठी वाद असेल तर त्यांना कोलीतच भेटते आयते. उदा.सुशांत , आता कंगना.
कंगना ही गुणी अभिनेत्री आहे.परंतु आजकालची तिची वाटचाल पाहता ती जरा भरकटलेली दिसतेय.सुरुवातीला ती जेव्हा बॉलिवूड बद्दल स्पष्ट बोलायची तेव्हा तिचे कौतुक होत होते.परंतु नन्तर नन्तर ती बेताल अन बोलघेवडी होत गेली.जणू प्रत्येक बॉलिवूड संबंधीत गोष्टीवर बोलण्याचा तिने मक्ताच घेतलाय. लोकांनी केलेली प्रशंसा तिच्या डोक्यात शिरली,अन दुर्दैवाने तिच्यातील एक चांगली,गुणवान अन स्पष्टवक्ती व्यक्ती हरवली अन हेकेखोर,बेताल नटीने जन्म घेतला. खरं तर अश्या प्रसंगात नेमके कुठे थांबले पाहिजे हेच खरे कौशल्य असते पण नेमके तेच ती विसरली अन वाहवत चालली.आता अश्या ठिकाणी ती पोहोचली आहे की ठरवले तरी तिला माघारी येणं मुश्किल आहे.कारण ती आता बाहुलं बनलीय,अन वरून तिचा हेकेखोर स्वभाव.त्यात अमित शहांनी गरज नसताना y+ सुरक्षा देऊन तिचा इगो अजूनच मोठा केलाय.यात पुन्हा उत्तरेकडची महाराष्ट्र असूया....
असो.महाराष्ट्र पोलीस अन मुंबई बद्दलचे जे अनुद्गार या बिनडोक नटीने काढले त्याबद्दल संजय राऊत पुढे सरसावले अन त्यांनी धिक्कार केला इथपर्यंत सारे ठीक होते. त्यांनी हरामखोर वगैरे म्हणणे हेही थोड्या फार प्रमाणात ठीक होते कारण महाराष्ट्रात असे बरेचसे शब्द ,ज्यांचे मूळ अर्थ वेगळे परंतु प्रासंगिक वेगळ्या अर्थाने वापरले जातात. जसे हरामखोर हा शब्द,याचा अर्थ वेगळा पण महाराष्ट्रात बऱ्याचदा वापरला जातो वेगळ्या अर्थाने. शाळेत शिक्षक ही उनाड विद्यार्थ्याबद्दल वापरतात तेव्हा त्यांना हरामखोरी अभिप्रेत नसते..असो राऊतांनीही चौथ्या स्तंभासमोर बोलतांना सावधगिरी बाळगली पाहिजे.त्यांच्या सारख्या नेत्यांकडून अशी चूक अपेक्षित नाही.कारण दिल्लीपती नादाचा पाद करायला बसलेलेच आहे.
मुंबई महापालिकेने एकदम कार्यक्षमता दाखवून कंगना च्या ऑफिस ची मोडतोड केली हे जरा अतीच झालं.म्हणजे तुम्हाला कोणी डिवचले तर तुम्ही खुन्नस काढाल कारण तुमच्या हाती सत्ता आहे.निदान उद्धव ठाकरेंनी हे होऊ द्यायला नको होतं.त्यांच्या प्रतिमेला तडा गेलाय या गोष्टीने. शेवटी यांचेही पाय मातीचेच निघाले.
मला एक गोष्ट पटत नाही की किती हा बालिश पणा.म्हणजे तू हे केलंस म्हणूनमी ते करीन.असे विचार लहानपनीही नव्हते आमचे.हसू येते की माणसं नुसती नावालाच मोठी होतात मात्र वागणूक तशीच राहते.
केंद्र आणि मीडिया -
आता केंद्राबद्दल. माझ्या मते सध्या देश कोणत्या घडीतून जातोय याचे केंद्रातल्या नेतृत्वाला काही सोयरे सुतक नसावे किंवा त्यांना त्या गोष्टीची उमज च नसावी.कारण आग रामेश्वरी अन बम्ब सोमेश्वरी अशी यांची गत आहे.GDP ने नीचांक गाठला आहे,आता पुढची वाटचाल भयावह आहे.सर्व तज्ज्ञांनी बेंबीच्या देठापासून ओरड लावलेली आहे पण नेतृत्व काळ झोपेत आहे किंवा त्यांना त्याची किंचितही समज नाही.मीडियाला त्यांनी दावणीला बांधले आहे,सोयीस्कर रित्या ती लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधते आहे.अक्षरशः हिणकस डाव मांडला आहे.इकडे मरायची स्थिती अन ती तुपाळ तोंडाचे लाळ घोटे अँकर जिवाच्या आकांताने आपण हे app कसे बंद केले अन त्याचा काय झटका बसला ह्याचे वर्णन करत आहे.पुढच्या अनेक वर्षात वाटचाल ही खडतर आहे,कसा त्यातून मार्ग काढावा याच्या विवेचना ऐवजी रिया ने आज काय खाल्ले असा पोरखेळ चालू आहे.आज मीडिया ने कमरेचे सोडून डोक्याला बांधले आहे.
मला विशेष वाटते ते लोकांचे,समाज असा कसा षंढ झाला आहे की त्याला काहीच समजेना.म्हणजे हा काल कोणता,कोणालाच देशाबद्दल काही वाटेनासे झाले आहे.म्हणजे वर बसलेली मंडळी खरच अशी विचारहीन झाली आहे?जर आपल्यासारख्या व्यक्तींना ही कळकळ वाटते तर वरच्या विचारी व्यक्तींची काय गत असेल? मनमोहन सिंह,रघु राम राजन यांचे काय हाल असतील? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे..
मंगळवार, २३ जून, २०२०
आमचे समूहगान...(..?...)
गुरुवार, १२ मार्च, २०२०
माझे वडील माझा आधारस्तंभ....!!!
श्री.सखाराम रंगनाथ पगारे' ,खरं तर हे नाव तुम्हाला माहित असायला हवं असं काही विशेष नाही.हा मनुष्य असा कोणी सेलिब्रिटी किंवा कोणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व नाही.पण माझ्यासाठी हे नाव खूप महत्वाचे आहे.माझ्या आयुष्याचा हा माणूस हिरो आहे. माझ्या वडिलांचे नाव हे.त्यांचं माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे,किंबहुना माझ्या जडण घडणीत आणि आता पर्यंतच्या वाटचालीत त्यांचाच मोठा हात आहे.
ह्या माणसाचे शालेय शिक्षण तसे यथातथाच . साधारण ITI झालेला ,परंतु जीवनाच्या शाळेत अनेक कडू गोड अनुभव घेऊन समृद्ध असलेला माणूस. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत नेहमी हसतमुख असणारा अवलिया. या माणसाने जीवनात कोणालाही एका शब्दाने दुखावले नाही किंवा त्यांचा अट्टाहासही नव्हता कि प्रत्येकाने असं वागलं पाहिजे वगैरे.म्हणजे अगदी स्वतःच्या मुलालाही म्हणजे मला त्यांनी कधीहि असं वाग किंवा हे कर ते कर असं सांगितलं नाही.परंतु त्यांचा जबरदस्त USP (Unique Selling Point ) म्हणजे आधी स्वतः आचरणात आणणे आणि त्यावरच चालणे.हेच बहुदा राष्ट्र सेवादलाचे संस्कार असावेत.सेवा दलाच्या मुशीत ते असे तयार झालेले होते कि आम्हाला त्याचा प्रत्यय पावलोपावली यायचा.
आपले काम शांतपणे करीत राहणे ,त्याचा डंका न वाजविणे.त्यांनी त्यांच्या आयुष्यातले उमेदीची काही वर्षे सेवादलाच्या पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून अकोल्यात काढली होती.अन हे मला त्यांच्याकडून कधीच कळले नाही.मला हे कळले पुरुषोत्तम पगारे सरांकडून! मला या गोष्टीचे अजूनही नवल आहे .आजकाल कोणी किरकोळ समाजकार्य म्हणा किंवा काही काम केले तर त्याचा गवगवा च अधिक होतो.
सेवादल त्यांच्या रक्तात असे भिनले होते कि त्यांच्या सध्या वागणुकीतूनही त्याची झलक भेटायची.एक किस्सा सांगतो.मला लहानपणापासून शिवाजी महाराजांचे खूप आकर्षण.सातवीत असतांना त्यांचा एक फोटो मी घरात लावला. दादा काहीही बोलले नाही परंतु त्यांच्या कपाळावरची सूक्ष्म आठी मला खूप काही सांगून गेली.मला अजूनही ते ठळक पणे लक्षात आहे. त्यांचा कधीही या गोष्टींसाठी विरोध नव्हता.परंतु त्यांचे विचार खूप समतल होते।कोणत्याही गोष्टीचा वैचारिक अतिरेक होऊ नये असे त्यांचे वागणे. हि गोष्ट माझ्या मनावर कोरली गेली.तेव्हापासून निष्पक्षपाती विचार करण्याची सवय जडली.
सेवादलाशी त्यांची नाळ चांगलीच जुळली होती.मामा गवरेंशी त्यांचे संबंध एखाद्या मुलाप्रमाणे होते.मामा हि त्यांना मुलाप्रमाणे वागवीत.कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही कार्यक्रमात असू द्या, स्वतःहून कामात झोकून देणार.कोणत्याही कामाची लाज त्यांनी बाळगली नाही.समाजात कुटुंबात त्यांना खूप मानायचे.अत्यंत लाडके व्यक्तिमत्व.त्यांना सगळे भाऊ म्हणून हाक मारीत.सगळ्यांना त्यांचा सहवास हवाहवासा वाटायचा.कुटुंबात ते सर्वात मोठे होते अन वागणुकीने देखील मोठेच!! आदर्श!!!
मी शाळे असतांना कधीही त्यांनी कसलीच जबरदस्ती केली नाही.लहानपणापासून त्यांनी मला वैचारिक स्वातंत्र्य दिले.कधीही माझ्या निर्णयात त्यांनी आडकाठी केली नाही.दरवेळी माझ्या निर्णयाचा त्यांनी आदरच केला.म्हणजे त्यांनी प्रत्येकवेळी माझ्यावर विश्वास च दाखवला.त्यामुळे लहानपणापासून स्वाभिमान अन स्वावलंबी पण माझ्यावर जडले गेले. अमही माझे शाळेतले मित्र त्यांची आठवण काढतात .
ते जरी साधे,सरळमार्गी असले तरी भित्रे अजिबात नव्हते.एकदा कॉलेजला कसले तरी भांडण झाले अन माझे नाव त्यात गोवले गेले.माझा त्या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता.दादांनी फक्त एकदा रोखून विचारले कि तुझा काही संबंध नाही ना? मी नाही म्हटल्यावर ते म्हटले मग घाबरू नको.कर नाही त्याला डर कशाला .गोष्ट पोलिसांपर्यंत गेलेली.पण दादा असे उभे राहिले माझ्यामागे कि विचारू नका! यथावकाश सर्व निवळले.मी काहीही केले नाही याची खात्री सर्वांची पटली . पण बाप हि काय चीझ असते हे दादांनी दाखवून दिले।
लहानपणी दादांनी सेवादलाची सर्व गाणी मला पाठ करायला लावलेली.त्यांचे कोणी सेवादलाचे मित्र आले कि मला म्हणायला लावीत.शिंग फुकले रणी,तुझ्या कामांमधून ,जिंकू किंवा मरू अशी कितीतरी.पाहुण्यांनी कौतुक केले कि दादांची छाती अभिमानाने फुगत असे.परंतु त्यामुळे माझ्यावरही सेवादलाचे संस्कार नकळत रुजले गेले.समतल विचार, साधेपणा ,एक कळली विचारसरणी नको इ इ.
उतारवयातही कोणावर आपला भार नको असे त्यांचे वागणे.स्वावलंबी पण हा मोठाच गुण होता त्यांच्याकडे. कधीही ते कुणाशी चुकूनही तुसडे वागले नाही.त्यांचे जुने मित्र भेटल्यावर त्यांची काली खुलत असे.सरांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी ( नम्रताच्या) जेव्हा सगळे सेवादलाचे जुने स्नेही भेटले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. अन विशेष म्हणजे माझे बरेचसे मित्र हे त्यांचे जवळचे मित्र होते.
असे माझे दादा.अजुनाही खूप त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे आहे परंतु लेखनसीमा.
गवारे मामा जन्म शताब्दीच्या अनुषंगाने पगारे सरांनी मला दादांबद्दल लिहायला हे व्यासपीठ दिले त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील.
जय हिंद...
विवेक पगारे
नवी दिल्ली
७८३५०६९०९०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)